शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

काम्रेड शरद पाटील यास्ले लाल सलाम लाल सलाम अहिराणी व्यक्ती लेख विशेष

खान्देश रत्न
  कामरेड शरद पाटील
    खान्देश म्हंजे खानम्सा वसेल देस. सातपुडा, सह्याद्रीन्या डोंगर रांगा, अजिंठाना डोंगर यास्ना मजारला खड्डाम्हा म्हंजे खानंम्हा खान्देश से. खानं म्हंजे खड्डा.हायी यक खान्देश नावनी व्युत्पत्ती से. तापी,गिरणा,पांझरा, बोरी आनि तिसन्या उपनद्यास्न मुबलक पानी राहे.रग्गड कमाया व्हयेत त्यामुये खान्देशम्हा सुबत्ता व्हती.
 खान्देशना इतिहास भी गवरवशाली से. हायी खान्देशनी खानंम्हा बराज नररत्ने जनमाले उनात.आज भी जगभरम्हा ज्यास्ना नावलौकिक व्हयेल से अस्या आसाम्या सेत. त्याम्हानज यक मोठ नावं म्हंजे " कामरेड शरद पाटील " त्यास्नी वयख करी ल्हीऊत.
   कामरेड शरद पाटील ह्या यक परख्यात प्राच्यविद्दापंडित, सत्यशोधक मार्क्सवादी इचारवंत. त्यास्ना जनम १७ सप्टेंबर १९२५ ले धुये तालुकाम्हाना कापडनाले सत्यशोधक कुटुबम्हा व्हयना. त्यास्ना वडिल तानाजी तुकाराम पाटील पह्यली पिढीम्हाना सत्यशोधक व्हतात.शरद पाटील यास्न प्राथमिक नी माध्यमिक शिक्सन धुयालेज व्हयन. सायम्हा अभ्यासू नी शिस्तवाला शिक्सक भेटामुये धाकलपनेज त्यास्ले सामाजिक बांधीलकी नी ध्येयवादनी प्रेरणा भेटनी. चित्रकलानी आवड बराबरज त्यास्ले अवांतर वाचननी गोडी लागनी. चित्रकलानी आवड आसामुये त्यास्नी यक साल बडोदाना कलाभवनम्हा पेंटिंग कोर्स कया. मंग सर जे.जे. स्कूल आँफ आर्टम्हा दाखल व्हयनात. तठे तिसरा वरिसले असताना राज्यभरना इद्दार्थी संपमुये त्यास्ले सिक्सन अपूर सोडन पड.
   धुयाले परत येवावर गव्हाणकर, अमर शेख,आण्णाभाऊ साठे ह्या शाहिरेस्ना सोबत - हावामुये १९४६ म्हा त्या कम्युनिस्ट पक्सना सभासद व्हयनात. त्यास्ले पह्यलेंग पक्सना मंबई हापेसम्हा स्टाफ आर्टिस्टन काम दिन्ह. सालभर नंतर धुयाले येवावर त्या गिरणी कामगार चयवयनं काम कराले लागनात. सरकारनी १९४८ म्हा सरकारनी जहाल कम्युनिष्टजवर कारवाईना बडगा उगारा तव्हय त्यास्ले खान्देशम्हाईन हद्दपार करेल व्हत. हद्दपारी संपानंतर त्या शेतकरी आघाडीम्हा काम कराले लागनात. त्यास्नी गोवामुक्ती आंदोलन तसज संयुक्त महाराष्ट्रनी चयवयम्हा भाग ल्हीना व्हता. 
  सन १९५६ ते ६० ह्या कायम्हा त्यास्नी उकाई धरनना इरोधम्हा चयवय उभारी. मातर त्यास्ले पक्सना पाठिंबा भेटना नही.आचार्य अत्रेस्नी त्यास्ले पाठींबा दिन्था. भारत चिन युद्धना येयखे कम्युनिस्ट भारत इरोधी सेत आसा आरोप व्हयना आनि कम्यनिष्टेस्नी धरपकड व्हयनी. तव्हय त्या औंरगाबाद नी नासिकनी जेलम्हा व्हतात.जेलम्हा त्यास्नी कार्ल मार्क्सना भांडवल / दास कँपिटल हाऊ ग्रंथ समजी ल्हीधा. भारतना समाज नी इतिहास हाऊ मार्क्सना तोकडा लिखान वरथाईन समजी ल्हेता येनार नही यान्ही खात्री पटावर त्यास्नी ह्या इषयवर सोता लिखान करान ठराव. संसोधन करासाठे बडोदाले गयात.तठे त्यास्नी १९६६ म्हा पंडित विद्दाभास्कर उपाध्याय यास्ना मार्गदर्शनखाल संस्कृत ना अभ्यास कया.
बडोदाथाईन परतावर त्यास्नी आदिवासी भागम्हा काम सुरु कय. पक्सनी जातिव्यवस्थाना इरोधम्हा लढा उभाराले नकार देवामुये पक्सम्हा वाद वाढनात. त्यामुये पक्षना राजिनामा देईसन आपला सहकारीज सोबत मार्क्सवाद, फुले, आंबेडकर वाद (माफुआं ) हायी इचारसरनीवर आधारित "सत्यशोधक कम्युनिस्ट पक्सनी" १९७८ म्हा स्थापना कयी. माफुआंना द्रुष्टीकोन येगयेगळा इषयेजवर मांडता येवाकरता त्यास्नी १९९२ म्हा सत्यशोधक मार्क्सवादी नावनं मासिक सुरु कय. त्यास्नी १९८२ ते १९९२ ह्या कायम्हा येगयेगया आंदोलने उभारी आदिवासीस्ना वन अतिक्रमणना लढा चालू ठेवा यासाठे त्यास्ले एसआरपीनी दडपशाहीले तोंड देन पडनं. 
  महाराष्ट्रनी साहित्य संस्कृतीनी चयवयम्हा कामरेड शरद पाटील यास्न योगदान महत्वान से. त्यास्नी इतिहास, संस्कृती, समाजकारण नी अर्थशास्त्र ह्या क्षेत्रम्हा लेखन कय. शेकडो लेख लिखात. न्यारा न्यारा इचारमंचेसवर जायी वादयी भासने दिधात. समाजम्हा वादये उठनात.
त्यासन प्रसिद्ध व्हयेल साहित्य दखा.
१ ) दासशूद्रांची गुलामगिरी खंड १ भाग १ व २
      जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व खंड २ ( १९९६ )
   जांत्यत भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती ( खंड ३ रा - २००३ )
प्रिमिटिव्ह कम्युनिझम मात्रुसत्ताक स्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद ( खंड ४ था-२०१२ )
 २) बुद्ध, भिख्खू आंनद, विशाखा १९८३
३) भारतीय तत्वज्ञान व नास्तिक मत १९८४
४) रामायण- महाभारतातील वर्णसंघर्ष १९८६
५) अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र १९८८
६) पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका१९८९
७) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्मणी १९९३
८) मार्क्सवाद -फुले - आंबेडकर वाद १९९३
९) स्री- शूद्रांचा राजा नाटक १९९८
१०) नामांतर औंरगाबाद व पुण्याचे २०११ 
       शरद पाटील यास्ना लेखनम्हा यकज ये ले भारतीय तत्वज्ञान, प्राच्यविद्दा, यान्हा समावेश आसामुये त्यास्न लिखान दूर्बोध न समजनार से आसा आरोप व्हस.त्यास्ना ह्या प्रचंड काममुये त्यास्ले महाराष्ट्र इतिहास परिषदना बा. सी. बेंद्रे महान इतिहासकार पुरस्कार तसज रा. ना. चव्हाण प्रतिष्टानना महर्षी विठ्ठल राक्षजी शिंदे पुरस्कार भेटेल सेत.
   कामरेड शरद पाटील हयातभर समाजम्हानी इषमता, शोषणना इरोधम्हा लढनात. आखेरले वयना ८९ वरिसले १२ एप्रिल २०१४ शनिवार रातले साडेदहा वाजता निधन पावनात. काही दिवसपासीन त्या ब्रेनहँमरेज मुये आजारी व्हतात. त्यास्ना मांघे बायको नजुबाई गावित, दोन पोरे यक पोरगी आसा परिवार से. त्यासना शेवटला दर्सनले चाहतास्नी रिघ लागेल व्हती. सजाडेल टँक्टरवर त्यास्ना देह ठेयेल व्हता. अंत्ययात्राम्हा सत्यशोधक इद्दार्थी संघटनानी क्रांतिकारक गिते म्हणात.
" काम्रेड शरद पाटीलको लाल सलाम लाल सलाम "
अस्या घोषनाजमुये परिसर दुमदुमना व्हता. त्यास्नावर अब्राह्मणी पद्धतखाल अंत्यसंस्कार झायात. त्यास्ले बायको नजुबाई गावित तसज प्रा. नचिकेत नी सरमद ह्या दोनी पोरेस्नी अग्निडाग दिन्हा. जमेल लोकेस्नी आसूस्नी श्रद्धांजली दिधी.
   काम्रेड शरद पाटील यास्ले लाल सलाम लाल सलाम.

त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य न ठरणारा बाबासाहेबांचा विचार

🎓📚🎓📚🎓📚🎓📚
त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य
  न ठरणारा बाबासाहेबांचा विचार!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
             खरं तर हां लेख मी 14 एप्रिलसाठी लिहिला होता. पण 14 एप्रिलला सोशल मीडिया वर बाबासाहेब यांना अभिवादनं करणारे खूप संदेश असल्यामुळे हां लेख आता रात्री पाठवत आहे. 

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

        तुमची बाजू सत्याची असेल आणि तुमच्या हातात कोणतीहीं साधन नसतील तर तुम्हाला तुमच्यावरील अन्याय निवांरण करण्यासाठी दिलेला महामंत्र आहे हां *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!*
        तुम्ही दुबळे आहात अन्याय करणारा प्रबळ आहे, तुमची बाजू खरी आहे, तर तुम्हाला न्यायासाठी त्याच्याशी संघर्ष करावाच लागेल. पण आलं मनात आणि उठले सुटले केला संघर्ष असं चालणार नाही. तस केलं तर ज्याच्याशी संघर्ष करायचा तों प्रबळ असेल त्यामुळे तों तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून मग तुम्हाला समविचारी लोकांचे संघटन उभ करावं लागेल. पण अशिक्षित अनाडी लोकांचं संघटन करून चालणार नाही. अशी माणसं एकत्र केली तर ते संघटन होणार नाही, ती टोळी होईल. हीं अशिक्षितांची टोळी, स्वतःवरी अन्याय दूर करण्या पेक्षा इतरांवर अन्याय करत सुटतील. संख्या बळाच्या आडदांड पणाच्या जोरावर ते लुटालूट करतील. म्हणून हीं सर्व मंडळी सुशिक्षित असावी. त्यासाठी सर्वात आधी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. इतरांना सुशिक्षित केलं पाहिजे. मग या सुशिक्षित लोकांचे संघटन करावं, अशा सुशिक्षिततांच्या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष केला पाहिजे. तुम्ही नक्की जिंकाल. विजयी व्हाल. म्हणून *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* हा रामबाण उपाय आहे.

*महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला!*

 कोण चूक, कोण बरोबर?
माझ्या मते दोघे बरोबर.
         म गांधीच्या काळातील देश हां कृषी प्रधान भारत होता. भारताची सर्व अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून होती. शेती हीं खेड्यातील लोक करत होते. कृषी प्रधान भारताची अर्थ व्यवस्था 80% शेतीवर अवलंबून असल्यामुळे खेड्याकडे चला हां गांधीजींचा सल्ला योग्य होता. पण त्या खेड्यात दलितांची स्थानं काय होत, याच भान कदाचित गांधीना नसावं किंवा त्याबाबत गांधीजीनी तसा विचार केला नसावा.
         पण बाबासाहेबांच तस नव्हत त्यांना प्रत्येक भारतीया सोबत दलित पीडिताची जास्त काळजी होती. ज्यांनी हजारो वर्ष केवळ अन्याय सहन केला होता त्या लोकांचा बाबासाहेब प्राध्यान्यानें विचार करत होते.
          त्यां दलितांचं खेड्यातील जगण अत्यंत वाईट होतं. गावातील सवर्ण समाज म्हणजे जे अस्पृश्य नाहीत. त्यांच्या पुढे दलितांच्या पिढ्यानं पिढ्या दबून होत्या अशा गावात वर मान करून बोलणं सोडा बघणंहीं शक्य नव्हते. तों बरोबरीच्या नात्यांने गावकऱ्याला राम राम किंवा नमस्कार सुद्धा घालू शकत नव्हता. जोहार मायबाप म्हणत होता. पाणी वरून टाकल जायचं. कोणाला स्पर्श झाला तर विटाळ व्हायचा. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे स्वतःच असं उत्पन्नाच कोणतही साधन नव्हतं. मोल मजुरी करायची तर त्याला योग्य मोबदला नाही. अशा लोकांनी खेड्यात गुलामा सारखं का रहायचं? उलट शहरगावांत कोणताही पाटील जमीदार, वतनदार दबाव टाकू शकेल अशी परिस्थिती नसते. झोपडपट्टीत एखाद्या छोट्याशा झोपड्यात संसार थाटावा लागेलं पण गावात तरी कुठे एवढ्या माड्या हवेल्या होत्या या लोकांच्या? तिथही झोपडीच या झोपडीतून त्या झोपडी हाच फरक. शिवाय रोजगाराला कमतरता नाही. गुलामीच ओझं नाही. शहरात मुक्त आयुष्य जगता येत म्हणून बाबासाहेब म्हणत होते शहरा कडे चला तेही बरोबर होते.
        त्याकाळातील परिस्थितीचं अशी होती की, महात्मा गांधीजीं जे म्हणत होते ते खेड्याकडे चला हेही बरोबर आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शहरांकडे चला. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते.
       पण आता परिस्थिती बदलली आहे. सर्वांचा शहरांकडे जाण्याचा ओढा वाढला आहे. कारण शहरात सर्व प्रकारच्या सुविधा एका जागी उपलब्ध आहेत. शाळा, महाविद्यालये, दवाखानें, स्वछ रस्ते, रोजगार, मनोरंजनाची साधान, वीज, पाणी, गॅस बाजार सर्व सुविधा जागेवर मिळतात. त्यामुळे सर्वत्र शहरी करण वाढत आहे आणि खेडी ओस पडत आहेत. काही लोक शेतीच्या निमित्ताने खेड्यात रहात असले तरी त्यांची शहरातहीं घर आहेत. त्यात सर्व परिवार राहातो आणि कधी तरी हवा पालट करायला वीक एन्ड घालवायला खेड्यातील घरी येतो. इथे बाबासाहेब यांची दूरदृष्टी जिंकली अस वाटत. पुढच्या भागात बघू या गांधी-नेहरू विरुद्ध कोण जिंकलं कोण हरलं!
🎓📚🙏🏻📚🎓 बापू हटकर 
🎓📚🎓📚🎓📚🎓📚

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे नानाभाऊ माळी

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
...नानाभाऊ माळी 

मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,
वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!
माझा मार्ग सत्याचा होता!माझा मार्ग न्यायाचा होता!माझा मार्ग अज्ञानी बांधवांना ज्ञानी करण्याचा होता!स्त्री मनात ज्ञानप्रकाश दाखविण्याचं भाग्य मिळालं!अतिशद्रांच्या दारात उभे राहून ज्ञानसूर्य दाखविण्याचं महाभाग्य लाभलं!जातीभेदाच्या पायावर उभा असलेला वर्ग शिक्षणापासून वंचित होता!त्यांनां ज्ञानी करण्याचं भाग्य निर्मिकाणे मला दिलें होते!अथकपणे कष्ट, झुंज, हक्काची लढाई लढत राहिलो!

...मी ज्योतीराव गोविंदराव फुले बोलतो आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!मी पुण्यातल्या गंज पेठेतील ज्योतीराव फुले बोलतो आहे!मी कर्मठांच्या पुणे शहरातील फुले बोलतो आहे!सर्व काही सहन करूनही जिद्दीने,ताट मानेनें उभा असलेला मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!...वर्षे कशी भरा भरा मागे निघून गेलीत!!इतिहासाची अनेक महत्वपूर्ण पाने उलटूनी गेलेतं!काही पाने जीर्ण झालीत!शिर्ण झालीत!१७५वर्षं झाली आहेत!इतिहास त्याचं जीर्ण पानातून जीवंत आहे!अजून शोषण जीवंत आहे!शोषणाची पद्धत त्या ठेकेदारांनी बदलली आहे!लढा सुरूच आहे!जातीयवाद अजूनही जीवंत आहे!स्वार्थ अजूनही धर्माच्या आड जीवंत आहे!तुमच्या शक्तीतून माझा लढा सुरूचं आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून जगावा!जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती न्याय हक्काने जगावा!शोषण विरहित जगावा!जगा अन जगू द्या सारखं जगावं!जातीच्या भक्कम भिंती फोडून,तोडून माणूस म्हणून जगावा!उच-निचता समाजाला लागलेली किड आहे,ती गाडून जगावा!वर्णभेदानें फोफावलेंली किड आहे, ती गाडून जगावा!प्राचीन काळापासून समस्त समाजास पोखरत राहिलेंली वाळवी आहे, ती नष्ट करून जगावा!किडेचा नायनाट व्हावा म्हणून माझा लढा होता!लढा आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आज ११एप्रिल!माझा जन्मदिवस आहे!आपण माझा जन्मदिवस साजरा करीत आहात!जन्मापासूनचं शेती आणि फुलांची आवड होती!वडिलांचा व्यवसाय होता!वडिलांनी मला शाळेत पाठवलं होतं!मी शाळेत गेलो!काही वर्ग शिकलो!"शूद्रानां शिकण्याचा अधिकार नाही!पाप लागतं"..असं माझ्या वडिलांनां धर्माच्या ठेकेदारांनी सांगितले!शिक्षणाचा उजेड खालच्या स्तरापर्यंत पर्यंत पोहचू दिला नाही!शिक्षणाची दरवाजे बंदिस्त होती!यामुळे मी ही उच्च शिक्षणापासून वंचित राहिलो!उच-नीच,जातीयवादी,भेदाभेदनें मन व्याकुळ झालं होतं!संपूर्ण मानव समाजास यां धर्म ठेकेदारांनी वेठीस ठेवले होते!शिक्षणापासून वंचित ठेवले होते!माझ्यातील शिक्षणाची धग शमली नव्हती!राखेंखालीलं विस्तवागतं धग होती!..सर्वप्रथम माझ्या पत्नीला,सावित्रीबाईंना शिकविले!ज्ञानदानाचा प्रकाश घरात प्रकाशित झाला!त्याचा उजेड समस्त महिलांना पोहचविण्याचे कार्य मी आणि सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमाने केलें!नवनवीन शाळा उघडून ज्ञानप्रकाश स्त्री मनात पोहचवीला!समस्यां अनेक होत्या!जाणूनबुजून खोडा घातला जात होता!अडथळे येत होती!तोंड देत,मार्ग काढीत ध्येयांकडे वाटचाल सुरूच होती!माझ्या भावा बहिणींनो मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आपण माझी जयंती साजरी करीत आहात!जन्मोत्सव साजरा करीत आहात!गावोगावी मिरवणूक काढून माझ्या कार्यास उजाळा देत आहात!सत्यशोधकी विचार,सत्यधर्माच प्रसार आपण केलात!आम्ही त्या काळी खऱ्या धर्माची,माणसातील माणुसकीची ओळख करून दिली! ती ज्योत माझ्या सर्व बांधवांनी तेवत ठेवली होती!स्त्री शिक्षणाच्या पेटवलेल्या ज्योतीतून अथकपणे शुद्रादि शुद्रांसाठीचा ज्ञानप्रकाश पोहचत होता"अंधश्रद्धे विरुद्ध लढत होतो!समाजावर धर्ममार्तंडांचां प्रचंड पगडा होता!अस्पृश्य वेशी बाहेर होते!हीन जीवन जगत होते!माणूस मुक्तीचा लढा सुरूचं होता!आज त्या कार्यास १७५ वर्षे झाली आहेत!लढा सुरूच आहे!आज आपण लोकशाहीतं जगत आहात!नवे वारे वहात आहेत!नव्या वाऱ्यातही जातीभेदाच प्रदूषण हळूहळू विष बनून फैलावत आहे!... मला अतीव दुःख होत आहे!जातीभेदाच्या भिंती अजूनही तशाच उभ्या आहेत!जातीच्या नावावर राजकारण होतं आहे!धर्माच्या नावाने राजकारण होत आहे!आधुनिक जगात वावरत असूनही जातीभेदाच्या भिंती ढसाळल्या नाहीत अजून!... मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!

धर्माच्या आडून स्वार्थ साधला जात आहे!शिक्षणाने उच्च शिक्षित होऊन ही जात आडवी येत आहे!अजूनही जातीच्या भक्कम जोखंडातून समाज मोकळा झालेला नाही!माझा त्यावेळेसही मानसिक छळ झाला होता!त्रास दिला गेला होता!मी धाडसाने सामोरा जात राहिलो!आज ही तेचं घडतं आहे!जातीभेदाची दरी वाढते आहे!जातीनिर्मूलन झालेचं नाही पण जातीयवादी शक्ती उघड उघड आव्हान देत आहेत!स्त्री-पुरुष समानता अजूनही आलेली नाही!फक्त कागदावर आलेली आहे!तोच कागद वादळात अधांतरी उडत आहे!जातीयवाद अन वर्गवादाचा अजगर ठेकेदारांकडून पोसला जात आहे!.....मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

माझं स्वप्न होतं!माझी मागणी होती!माणसाला माणूस बनवायचं होतं!जातीविरहित समाज नजरेसमोर होता!स्वातंत्र्य,बंधुता, समानता, समता,समरसतेवर आधारित समाज रचना असावी असं माझं स्वप्न होत!न्याय हक्कासाठी माझा लढा होता!माणूस कुणाचा गुलाम नाहीये!माणूस जन्माने शूद्र, अतिशूद्र असला म्हणजे श्रेष्ठ नाही का?शिक्षणाने तो सर्व श्रेष्ठ ठरतो!माझा लढा शेतकऱ्यांच्या दरिद्री, दैन्यवस्थेसाठी होता!माझा लढा सत्य शोधनाचा होता!माझा लढा शिक्षणासापासून वंचित असलेल्या स्रि्यांसाठी होता!माझा लढा परित्यक्तां महिलांच्या भवितव्यासाठी होता!शूद्रादिशूद्रांच्या उन्नतीसाठी होता!माझा लढा वर्णभेद,जातीभेद उच्च-कनिष्ठ भेदभाव अन अन्याया विरुद्ध होता!माझा लढा दीन-दुबळ्यांच्या उद्धारासाठी होता!माझा लढा धर्ममार्तंडांच्या अन्यायी कृती विरोधात होता!मी लढत होतो!भांडत होतो!अजूनही लढा संपलेला नाहीये!माझा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशूद्रांच्या दास्यमुक्तीसाठीचा लढा चालूचं ठेवला होता!समानतेचा हक्क, शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची हाक दिली होती!... मी 
मी संघर्ष केला होता!सावित्रीबाईची साथ होती!सर्वजन साथीला होते!सर्व पद दलितांची साथ होती!आजही माझं स्वप्न अधुरे आहे!अपूर्ण आहे!मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌷

पदोपदी माझा अपमान होत राहिला! उच्चवर्निंयांच्या मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलें!माझ्यावर मारेकरू धाडले होते!सावित्रीबाईवरं सतत शेण,चिखल फेक होत राहिली!अन्याय सहन करीत स्त्री शिक्षणकार्य नेटाने सुरूच होतं!अतिशूद्र, सोषितांच्या हक्कासाठी माझा लढा होता!माझ्या घरचा हौद खुला केला होता!त्यांची तहान भागली होती!!माझ्या हृदयातली तहान भागली होती!मी शूद्र होतो!तें अतिशूद्र होते!दोघेही शोषित होतो!दोन्ही एकाचं पातळीवर होतो!माझं काय चुकलं होतं?? मी समस्त शोषित वर्गासाठी लढा उभारला होता!मूठभर स्वार्थ, ज्ञानी समजणाऱ्यांनी माझा कोंडमारा केला होता!माझं जगणं समर्पित होतं!हा माझा गुन्हा होता? प्राचीन जुनाट,खुळंचट परंपरेच्या अभेद्य भिंतीनां सुरुंग लावला होता!एक एक करीत त्या भक्कम भिंती ढासळू लागल्या होत्या!भगदाड पडायला लागले होते!सत्यशोधक समाजाचा सत्य दाखवणारा हा उजेड होता!मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

अंधश्रद्धेतं लिप्त ढोंगी धर्म ठेकेदार देवतांची भीती दाखवून लुटमार करत होते!त्यांना सामोरे जात सत्याचा लढा सतत सुरूच होता!माझा लढा खुळचट कर्मकांडाविरुद्ध होता!धर्मविरुद्ध नव्हता!माझा लढा वर्ण आणि वर्गवादाविरुद्ध होता!आम्ही घाबरलो नाही,डागमगलो नाही!सामाजिक न्यायाचा लढा अखंड सुरूच होता!शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो!ज्ञाननिर्मितीचं केंद्र आमच्याचं घरात होतं!शिक्षण घराघरात पोहचवंत होतो!स्त्री-पुरुष शिकत होते!शुद्रादि अतिशूद्र शिकत होते! ज्ञानकण वेचित ज्ञान प्रकाशात न्हावून निघतं होते!माझा लढा अज्ञानी,दीन-दुबळयांच्या उद्धारासाठी होता!मानसिक जोखंडा पासून मुक्तीसाठी होता!सत्याचा लढा अखंड चालूच ठेवला होता!नंतर ही न्याय हक्कासाठी लढा सुरूचं आहे! शोषित सामाजिक समानतेपर्यंत पोहचत नाहीत तोवर हा लढा सुरूचं राहणार आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

माझा लढा मानव उद्धारासाठी होता!धार्मिक अवडंबर विरोधात होता!गावाच्या वेशीबाहेरील शोषितांसाठीचं होता!अस्पृशांसाठीच होता!स्त्री शिक्षणासाठीचं होता!पोटासाठी लाचार असणाऱ्या शुद्रादी अतिशद्रांसाठी,पोटग्रस्तांसाठी होता!कुत्र्यापेक्षाही हिन जगणं ज्यांच्या वाट्याला आलं त्यांच्या हक्कांसाठी होता!हा वर्ग संघर्ष होता!हा वर्ण संघर्ष होता!धर्माच्यां निश्चित अर्थासाठी होता!माणूस पशु नाही!माणूस गुलामही नाही!माणसाला बुद्धी आहे!वाचा आहे!तो गुलाम कसा होऊ शकतो?माणूस जन्माने श्रेष्ठ नाही!माणूस कर्माने श्रेष्ठ आहे!माझा लढा अन्यायी रूढी विरोधात होता!तो विरोध तुमच्या रूपातून अजूनही जीवंत आहे!समान न्यायासाठीचा हा लढा अजूनही जीवंत आहे!आपण जातीभेदाच्या भिंतीनां धडका देत रहा!माणसाच्या मानसिक वेठीबिगारी अन गुलामी पासून मुक्ती मिळेल तेव्हांचं खरं स्वातंत्र्य नजरेस दिसेल!माझा लढा हा तुमच्यातून उभा आहे!मी तुमच्यात उभा आहे!तुम्ही लढत रहा!.. मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्याचा आग्रह धरून चालतांना "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली!शोषित वर्गाला न्याय मिळावा म्हणून २४सप्टेंबर १८७३साली पुणे नगरपालिकेचा सदस्य झालो होतो!सार्वजनिक सत्यधर्म पुजाविधी पुस्तक असं अशा अनेक आधुनिक मूल्यांचां प्रारंभ केला होता!आधुनिक क्रांतिची मशाल घेऊन पुढे निघालो आहोत!माझा लढा मानवतावादी दृष्टिकोनासाठी होता! माझा कार्यगौरव म्हणून "महात्मा" पदवीनें सार्वजनिक ठिकाणी गौरविण्यात आल होत!रात्रंदिवस फक्त आणि फक्त शोषितांच्या जगण्यासाठीचा लढा उभारला होता!बालहत्या प्रतिबंधक गृह सुरुवात केली होती!अनेक रात्रशाळा सुरु केल्या होत्या!"ब्राम्हनांचे कसब" पुस्तकातून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला होता!माझा लढा आर्थिक उन्नतीसाठी होता!माझा लढा सामाजिक न्यायासाठी होता!स्रिशिक्षणासाठी हंटर कमिशन समोर निवेदन देण्याचा आग्रह होता!"तृतीयरत्न" हे नाटक, "इशारा","अस्पृशांची कैफियत" ग्रंथातून मांडली होती!माझा लढा थांबलेला नाहीये!पुढे असाच समाजाच्या उन्नतीसाठी चालू राहील!तुमच्या कृतीतून चालू राहील!माझा लढा थांबलेला नाहीये अजून!सामाजिक क्रांतीची मशाल घेऊन लढा सुरूचं राहणार आहे!"🌹

जन्माने उच्च अन श्रेष्ठ समजणारे मूठभर ठेकेदार विशाल सागरासं ओंजळीत घेऊ शकत नाहीत!खुळचट धर्म कल्पनांनी जन्माने श्रेष्ठत्व लादू शकत नाहीत!आपण परिपूर्ण ज्ञान समृद्धीने समानतेचा पाया रचत आहात!त्यातूनचं शास्वत सत्यधर्माचा जन्म होतं राहील!उचनीच भेदभाव विरहित माणसाचा जन्म होतं राहील!सत्यासाठी माझा लढा होता!माझा लढा जोखंडापासून मुक्तीचा होता!संपूर्ण परिवर्तनाचा होता!माझा लढा कष्टाळू शेतकऱ्यांसाठी होता!माझी लेखणी न्यायासाठी आक्रमक झाली होती!मी लिहीत होतो!मी तसाचं कृती करीत होतो!मी ताठपणे उभा होतो!माझ्या विरुद्ध अनेक होते!मी विरोधाला जुमानित नव्हतो!माझा लढा स्त्री दास्य मुक्तीसाठी होता!अजूनही त्याच सत्याची वाट पाहत मी उभा आहे!अनेक पुतळ्यातून आपणास उमेदीचा संदेश देत उभा आहे!माझा पुतळा अंधारातून उजेड दाखवत उभा आहे!सामाजिक क्रांतीची मशाल होऊन अनेक ठिकाणी, अनेक शहरात,खेड्यात उभा आहे!तेथे पूर्ण सत्याचा उजेड असेल!वाट पाहत आहे!मी महात्मा ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्य दर्शनासाठी "शेतकऱ्याचा आसूड" लिहावा लागला!अमेरिकेतील शोषित निग्रो बांधवांच्या छळानें "गुलामगिरी"लिहावं लागलं! हा ग्रंथ निग्रो बांधवाना अर्पित केला होता!महाराष्ट्र शूर,धाडसी,लढाऊंचा देश आहे!छत्रपती शिवाजी राजांवर माझी नितांत श्रद्धा होती!रायगडा वरील समाधी शोधली अन पोवाडा लिहून शौर्याची गाथा माझ्या हृदयातून गात राहिलो!... मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल २०२३

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.... (हेरंबकुलकर्णी)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...

बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.... (हेरंबकुलकर्णी)

उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य
त्यात ३० वर्षे शिक्षणात 
आणि १९४६ नंतरचा काळ,
दिल्लीत व्यस्त राहीलेला...

अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना 
चळवळ आणि लेखनाला...
त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. 
इतक्या थोड्या काळात हा माणूस 
 नियतकालिके चालवतो, 
२३ ग्रंथ लिहितो,
शेकडो लेख लिहून 
भाषणे करत राहतो...

मनुस्मृती दहन, 
चवदार तळे,
काळाराम मंदिर आंदोलन,
 शिक्षणसंस्था स्थापना, 
राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, 
गोलमेज परिषद
 आणि हजारो मैलांचा प्रवास...
वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...

हे सारे सारे तुम्ही ,कसे जमवले असेल ,बाबासाहेब ?
याचा हिशोब मला लागत नाही...

आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही
मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,
अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही 
की बोलायला फोन नाही...

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून
  गावकुसाबाहेरच्या
 त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर  
कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे,
 खेडी सोडण्याचे 
आणि पोरांना शिकवण्याचे...
पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,
 ती सारी माणसे 
 टेक्नोसॅव्ही नसणारी...
फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली, भेदरलेली...

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या 
सुगम भाषेत बोलला असेल...? 
की
 ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे 
थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.....

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल ?
त्या खेड्यापाड्यातील माणसांची....?

नुसत्या टाइम मॅनेजमेंट साठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,
आणि माणसांपर्यंत पोहोण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला
 हव्यात 
कारण आज सगळी साधने हाताशी असूनही 
आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत...
कोसो दूर....

 हेरंब कुलकर्णी
__________________________

( हेरंबकुलकर्णी यांच्या ' *अस्वस्थ क्षणांच्या नोंदी'* या कवितासंग्रहातली ही कविता. कवितासंग्रहासाठी 
संपर्क -9921288521)

स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका...



स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका...

      प्राचीन भारतात मातृसत्ताक समाज व्यवस्था प्रचलित होती.या मातृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये गणप्रमुख म्हणून स्त्रियांना गणधनाचा समान वाटप करण्याचा अधिकार होता.धर्म आणि तत्वज्ञान यावरील चर्चेमध्ये सहभागी होण्याचे सर्व अधिकार स्त्रियांना होते.शिक्षण आणि ज्ञान या क्षेत्रात स्त्रिया उच्च स्थानी होत्या.परंतु प्रतिक्रांतीनंतर स्त्रियांची जी अवनती झाली याचं वर्णन डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 'प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती'या पुस्तकात करतात.मातृसत्ताक समाज व्यवस्था हळूहळू नष्ट करण्यात येऊन पुरुषसत्ताक व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यात आलं.शासन आणि प्रशासन चालविणाऱ्या स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली.'न स्त्री स्वातंत्र्य अर्हति'या धर्मशास्त्राच्या नियमानुसार स्त्रीकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहिले जाऊ लागलं.सर्व प्रकारच्या मानवी हक्क आणि अधिकारांपासून स्त्रीला वंचित करण्यात आलं. पशुपेक्षाही अत्यंत हीन नशा प्रकारची वागणूक स्त्रियांना देण्यात येऊ लागली.संपूर्ण अस्पृश्य समाज हा उच्चवर्णीयांचा गुलाम झाला होता. स्त्रिया तर दुहेरी गुलाम होत्या एक धार्मिक व्यवस्थेच्या आणि दुसऱ्या पुरुष व्यवस्थेच्या.अशा या अन्याय- अत्याचाराच्या अंध:कारात खितपत पडलेल्या,गुलामीचं जीवन जगत असलेल्या,सामाजिक विषमतेनं ग्रासलेल्या समाज व्यवस्थेच्या विरोधात संत नामदेव,संत कबीर, संत रविदास,संत तुकाराम,संत गाडगे महाराज यांनी संघर्ष केला आणि आपल्या वैचारिक प्रबोधनानं आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी समाजामध्ये समतावादी आणि मानवतावादी विचारांची पेरणी केली. संतांनी केलेल्या वैचारिक प्रबोधनामुळेच त्यानंतरच्या काळात राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजश्री शाहूजी महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील विषमतावादी समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्षाची भूमिका घेऊन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
          समतावादी आणि मानवतावादी संत आणि थोर महापुरुषांच्या विचारांच्या पायावर स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय ही तत्वे राज्यघटनेत समाविष्ट करून कायद्याची भव्य इमारत उभी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान बहाल केलं.समाज व्यवस्थेत स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत, समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणावयाचा असेल तर पुरुषांप्रमाणं स्त्रियांचाही विकास होणं आवश्यक आहे.यासाठी डॉ.बाबासाहेबांनी आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात समानता निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या कलमांचा समावेश केला.२६जानेवारी१९५० ला ज्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली त्याच दिवशी खऱ्या अर्थानं बहुजन समाज हा आर्थिक, सामाजिक,आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त झाली.स्त्री ही केवळ उपभोगाचीच वस्तू आहे असे मानणाऱ्या मनुस्मृतीचं दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारतात स्त्री स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की,कोणत्याही चळवळीचं यशापयश हे त्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग किती प्रमाणावर आहे यावर अवलंबून असतं.म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक चळवळीमध्ये स्त्रियांना महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं दिसून येतं. स्त्रियांसंबंधीचा पारंपारिक दृष्टिकोन नष्ट व्हावा आणि त्यांना समान संधी, समान दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सतत आपले विचार स्पष्टपणे मांडलेले दिसून येतात.२६डिसेंबर१९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना उद्देशून असं म्हणतात की,अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचाच आहे.म्हणून अस्पृश्य अशी ओळख पटविणाऱ्या ज्या जुन्या व गलिच्छ चालीरीती आहेत त्या सोडून देण्याचं आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी करतात. सन्मानानं जगण्यासाठी चांगले कपडे, चांदीचे व कथलाचे भाराभर दागिने घालण्यापेक्षा एकच सोन्याचा दागिना घाला, अन्यथा घालू नका. 'खाण तशी माती' ही गोष्ट ध्यानात ठेवून आपली पिढी जर तुम्हास सुधारावयाची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका.तसेच मुलींना महत्त्वाकांक्षी बनवा असेही ते स्पष्टपणे सांगतात. 
          २८जुलै१९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधान परिषदेत भाषण करताना कारखान्यातील महिला कामगारांना बाळंतपणाची भरपगारी रजा मिळाली पाहिजे अशी मागणी करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की,जनहित हे शासनाचे प्रथम कर्तव्य असल्यानं शासनाने त्याबद्दलचा थोडा आर्थिक भार आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांद्वारे त्यांच्या श्रमाचा जास्त फायदा उपटणाऱ्या कारखानदारांवर आर्थिक मोबदल्याची जबाबदारी टाकली पाहिजे.११नोव्हेंबर१९३२ रोजी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं मुंबई प्रांत विधिमंडळात संतती नियमना बाबतचं अशासकीय विधेयक मांडले गेले होतं.परंतु सनातनी सदस्यांच्या मताधिक्यामुळे ते फेटाळण्यात आलं. संतती नियमनाचा पुरस्कार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की, "कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल त्यावेळी तिला गर्भधारणा टाळता येण्याची मुभा असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणं हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असलं पाहिजे." संतती नियमनाची साधनं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असावीत असंही त्यांचं आग्रही मत होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांच्याप्रति असलेला सन्मान यातून प्रतीत होतो.
         'स्त्रियांच्या विकासाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय विकासाचा कार्यक्रम'असं डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अचूक हेरलं होतं.म्हणूनच मुलींची लग्न लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका असंही ते आवर्जून सांगत.स्त्री ही एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्य दिला असावयास हवं,हा विचार व्यक्त करताना ते परखडपणानं म्हणतात की, आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याबाबत मुलींना अधिकार असावा.तसेच लग्नानंतर पत्नी ही पुरुषाची समान अधिकारी असणारी गृहिणी असली पाहिजे;ती मैत्रिणीप्रमाणं असावी,नवऱ्याची गुलाम असता कामा नये.आजची परिस्थिती पाहिली असता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. डॉ‌.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ हिंदू आणि अस्पृश्य स्त्रियांच्या सुधारणांविषयी भाष्य केले नाही तर, भारतीय मुस्लिम स्त्रियांची स्थिती ही हिंदू स्त्रियांपेक्षाही अधिक वाईट आहे असं स्पष्टपणे ते नमूद करतात. आर्थिक स्वावलंबन आल्याशिवाय स्त्रियांचा विकास होणं शक्य नाही. म्हणून स्त्रियांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना समान संधी आणि सर्व समान मानवी हक्क मिळावेत यासाठी संविधानामध्ये कलम १४,१५,आणि १६ यांची तरतूद केली.त्यामुळे भारतातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष कायद्यानुसार समान आहेत.धर्म, जात,वंश,लिंग आणि निवासस्थान यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही व सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. भारतीय संविधानानं दिलेल्या या मूलभूत हक्कांचा परिणाम विशेषत: स्त्री जीवनावर असा झाला की, त्यामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालय यांची व्यवस्था,विशेष शिष्यवृत्ती योजना, नोकऱ्यांमध्ये समान संधी निर्माण करण्यात आल्यात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला.म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया अग्रस्थानी दिसून येतात.सर्व प्रकारच्या मानवी हक्क आणि अधिकारापासून वंचित असलेल्या स्त्रियांना व्यक्तिमत्व विकासाची संधी प्राप्त झाली. मार्गदर्शक तत्वांमध्ये स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व स्त्री पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळविण्याचा समान अधिकार दिलेला आहे.तसेच समान कामाबद्दल समान वेतन, मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याची व्यवस्था,स्त्रियांना भर पगारी बाळंतपणाची रजा,रजेनंतर पुन्हा नोकरीची हमी ,प्रसूती भत्ता तसेच विधिविषयक मोफत सहाय्य देण्याची व्यवस्था समाविष्ट आहेत. कलम २१ हे जगण्याचा हक्क म्हणजे काय?याची फार व्यापक आणि अर्थपूर्ण व्याख्या करते.
          अमेरिकेसारख्या प्रगत आणि विकसित देशात स्त्रियांना मताच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला.मात्र भारतात संविधान लागू झाल्याबरोबर स्त्रियांना मताचा अधिकार मिळाला.सामाजिक धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील समानतेबरोबरच राजकीय क्षेत्रातही समान संधी मिळावी म्हणून सन १९९४ मध्ये ७३वी व ७४वी घटना दुरुस्ती होऊन महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के राखीव जागा ठेवण्यात याव्यात अशी तरतूद करण्यात आली.हे केवळ घटनेमध्ये समाविष्ट असलेल्या मूलभूत हक्कांमुळे शक्य झालं.स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चार वर्षे अथक परिश्रम घेऊन हिंदू कोड बिलाचं विधेयक संसदेसमोर सादर केलं.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हिंदू कोड बिल नामंजूर करण्यात आलं.हिंदू कोड बिलामध्ये आई-वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणे मुलींनाही समान हिस्सा,घटस्फोटाचा अधिकार, स्त्री धनाचा विनियोग करण्याचा अधिकार,पुनर्विवाहाचा अधिकार, एक पत्नीत्वाचा कायदा,पोटगीचा अधिकार,दत्तक विधान,अज्ञान पालकत्व या बाबी समाविष्ट होत्या.मात्र हिंदू कोड बिल नामंजूर करण्यात आलं. त्यामुळं २७सप्टेंबर १९५१रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.अशा प्रकारे स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती आहेत. जर हे बिल पास झाले असते तर स्त्रियांना त्याचवेळी समान हक्क आणि अधिकारांची प्राप्ती होऊन स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्या मार्ग मोकळा झाला असता आणि स्त्री पुरुष समानता निर्माण झाली असती.नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदू कोड बिलामधील तरतूदी हळूहळू लागू करण्यात आल्या.
        संविधान अंमलात येऊन आज ७० वर्षे होऊन गेली आहेत, तरीदेखील भारतामध्ये स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होत आहेत. आजच्या स्त्रिया कायद्याने जरी स्वतंत्र असल्या तरी त्या मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या अजूनही गुलामच आहेत.समान संधी आणि समान न्यायापासून त्या वंचित आहेत.स्त्री-पुरुष असमानता आजही समाजात अस्तित्वात आहे हे अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो यावरूनच निदर्शनास येते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी व मानवतावादी विचारांचा भारतीय समाजाने स्वीकार करणं आवश्यक आहे. समाजामध्ये सामाजिक,धार्मिक आणि राजकीय समानता निर्माण करण्यासाठी सर्व समाजातील बुद्धीजीवी वर्गानं तळागाळातील जनतेला संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देणं आवश्यक आहे. महापुरुषांचे अंधभक्त होण्यापेक्षा डोळस अनुयायी होणं आवश्यक आहे.कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना संदेश देऊन गेले आहेत की, "माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझं जे कार्य अपूर्ण राहिलं आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावा." हाच संदेश डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या ध्येयाकडं वाटचाल करणं हेच खऱ्या अर्थानं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आपलं उत्तरदायित्व ठरेल.

प्रणाली मराठे - धुळे.
मो.नं-९९७०९५५२५५

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी अर्थात् दि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या नावे अवकाशात एका तार्याचे नामकरण

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणार्या तमाम भारतीय बांधवांना श्री गुलाब मोरे यांचा सप्रेम जयभीम🌹🙏

मित्रांनो, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी अर्थात् दि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या नावे अवकाशात एका तार्याचे नामकरण होत आहे. ही घटना समस्त राष्ट्रप्रेमी भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद नि आनंददायी घटना आहे. ह्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांचा जयंती दिन हा "विश्वतारा गौरव दिन" म्हणून साजरा करणे औचित्यपूर्ण ठरेल असे मला वाटते त्या प्रमाणे आपणांसही वाटत असेलच. 
          डॉ बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर आपल्या भारत देशाचा कारभार चालतो. भारतीय संविधानात जातप्रांतधर्मभाषालिंगनिरपेक्ष सर्वांना मानव म्हणून एकसमान दृष्टीकोनातून मुलभूत सप्तस्वातंत्र्ये, न्याय्य हक्क, अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मानव म्हणून भारतीय संविधान विश्वातील समस्त मानवजातीचा गौरव करते. तेव्हा दि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या जयंती दिनी त्यांच्या नावे अवकाशात नामकरण होत असल्याच्या मंगलमय पार्श्वभूमीवर हा दिन "विश्वतारा गौरव दिन" म्हणून भारत सरकारद्वारा घोषित करण्यात यावा व दरवर्षी ह्या दिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाबासाहेबांसारखं मानव कल्याणक कार्यरत व्यक्तीस मा. भारत सरकारद्वारा सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे असे लेखी निवेदन आदरणीय श्रीम. द्रौपदी मूर्मू, महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार व आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब, सन्मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचेकडे सविनय करण्याबाबत श्री गुलाब धंजी मोरे, धुळे आपणांस विनम्र आवाहन करीत आहेत. तसेच अशीच निवेदने प्रत्येक राज्याच्या आदरणीय सन्मा. मुख्यमंत्री महोदयांना व प्रत्येक जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्याबाबत ही श्री मोरे समस्त प्रिय भारतीय बांधवांस विनम्र आवाहन करतात. 
 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
        श्री गुलाब धंजी मोरे,धुळे
        मो. ९४०४१९०४३२

कामगार चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख



डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ

       आजच्या वर्तमानस्थितीचं अवलोकन केले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगारांच्या बाबतीतील विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कामगार ज्या अवस्थेतून जात आहेत त्यामागची कारणं जर लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व लक्षात येते. कोरोनाच्या महामारीमुळे भारतात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच व्यवहार ठप्प पडले.कारखाने बंद झाले. सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय हे बंद झाले. त्यामुळे त्यावर आधारित सर्वच कामगार वर्ग हा बेरोजगार झाला. सुरुवातीला त्यांना वाटले की लॉकडाऊन काही जास्त दिवस राहणार नाही. म्हणून ते जवळपास महीनाभर शांत होते. परंतु हळूहळू लॉकडाऊनचा कालावधी हा वाढतच गेला आणि जवळची सर्व जमापूंजी संपल्यावर कामगारांना घरी बसून राहणे शक्य नव्हते. ज्या भाकरीसाठी ते घरदार सोडून परक्या शहरात वास्तव्यास आले त्याच भाकरीसाठी त्यांना पुन्हा आपापल्या गावी जाणे आवश्यक होते. म्हणून प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था होत नसलेली पाहून घराच्या ओढीनं हा मजूर वर्ग हजारो मैल पायपीट करीत निघाला. उन्हातान्हात उपाशीपोटी लेकरंबाळांना सोबत घेऊन अनवाणी पायानं रस्ता तुडवितांना आपण साऱ्यांनीच त्यांना पाहिलं. देशाचा अर्थ व्यवस्थेचा कणा हा कामगार वर्ग.देशाची उभारणी करणारा हा कामगार वर्ग. मात्र स्वतःचीच उभारणी करण्यात अयशस्वी ठरला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा बहुतांश कामगार वर्ग असंघटित आहे आणि आपल्या हक्क अधिकारांप्रति तो अजूनही अनभिज्ञ आहे. म्हणूनच या कामगार वर्गाचं नेहमीच शोषण होत आलेले आहे.
         अगदी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून तर आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास ७३ वर्षे होऊनही कामगारांचे शोषण अजूनही थांबलेले नाही. संघटित कामगारांची स्थिती थोडीफार बऱ्यापैकी आहे. कारण त्यांच्या कामगार संघटना अस्तित्वात आहेत आणि त्याद्वारे त्यांच्या हक्क अधिकार यांच्याप्रति ते जागृत असतात परंतु भारताने खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्विकारल्याने आज संघटित कामगारांची संख्या फारच कमी आहे. भांडवलदारांनी कंत्राटी पद्धत अंमलात आणल्याने कंत्राटी मजूरांची संख्याच मोठ्या प्रमाणात आहे.कंत्राटी मजूर देखील असंघटित कामगार आहेत.त्यांच्या कामगार संघटना नाहीत. त्यांना संघटित कामगारांच्या मोठ्या संघटनेत सहभागी होता येते. परंतु कारखानमालकाच्या कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने ते संघटनेत सामील होत नाहीत.
       लॉकडाऊनच्या काळात कामगार वर्गाला अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु या श्रमिकांवर अशी वेळ का आली हे लक्षात घेतले असता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार आणि कामगार चळवळीसंबंधीचे विचार आजही महत्त्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब असे म्हणतात की, "ज्याच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते.हा सिद्धांत कोणीही नाकारु शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्याचे आणि सर्व अडचणींतून मुक्त होण्याचे एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्तीइतकी नसली तरी राजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून बरीच परिणामकारकही आहे. कारण शोषित पिडीत वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क मिळाले आहेत ते आपल्या शत्रूंनी आपल्या यंत्रणेद्वारा आणि आपल्यातील स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कूचकामी करुन टाकले आहेत." डॉ.बाबासाहेबांच्या मतानुसार कामगार वर्गाकडे राजकीय सत्ता असणे आवश्यक आहे. शोषित पिडीत वर्गाचे प्रतिनिधी अर्थातच कामगार वर्गाचे प्रतिनिधी संसदेत जाणे आवश्यक आहे.जेणेकरुन ते प्रतिनिधी आपल्या कामगार वर्गाच्या समस्या, प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडू शकतील.
          डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की,"माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंशी तोंड द्यावे लागते.हे दोन शत्रू म्हणजे : ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत.ब्राम्हणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वांचा अभाव असा अर्थ मला अभिप्रेत आहे." डॉ. बाबासाहेबांच्या या मताच्या अनुषंगाने विचार केला असता तर आजही हीच खरी परिस्थिती आहे. कारण संसदेत जे लोक आहेत ते जास्तीत जास्त ब्राह्मणवादी विचाराने ग्रस्त असून भांडवलशाहीचे पोषण करणारे आहेत. म्हणूनच कामगार वर्गास अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगणं भाग पडत असतांना सुद्धा संसदेत एस.सी,एस.टी.,आणि ओ.बी.सी. वर्गाचे प्रतिनिधी असतांना सुद्धा कामगारांच्या हितासाठी कुणीही आवाज उठविलेला दिसून येत नाही.डॉ. बाबासाहेब प्रचार-प्रसार माध्यमांचं महत्त्व अधोरेखित करतांना असे म्हणतात की,आपल्या कामगार चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एखादे प्रभावी दैनिक वर्तमानपत्र पाहिजे. आजही आपण जर याचा विचार केला तर कामगार, शोषित-पिडीत यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समाजासमोर आणणारे प्रभावी असे दैनिक वर्तमानपत्र नाही. प्रचार प्रसार माध्यमे ही सरकारची आणि भांडवलशाहीची बटीक झालेली दिसून येतात. त्यामुळे कामगार वर्गाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.
       कामगार ऐक्याच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब असं म्हणतात की,"सामाजिक दृष्टीने उच्च नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्वतः चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे, हे कामगारांना सांगणे तसेच वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय." वर्तमानस्थितीत कामगारांच्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत सरकार उदासीन दिसून येते याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, कामगार हे संघटित नाहीत. जाती धर्माच्या आधारे ते अजूनही विखुरलेले आहेत. त्यांच्यामध्ये एकीची भावना नाही.कामगार वर्ग म्हणून ते एकत्र यायला मानसिकरित्या तयार नाहीत. जोपर्यंत ते कामगारवर्ग म्हणून संघटित होऊन त्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढा देत नाहीत तोपर्यंत त्यांची दखल कुणीही घेणार नाही.म्हणून सर्व शोषित पिडित कामगारांनी संघटित होऊन कामगारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून प्रसंगी कामगारांच्या हितासाठी जाबही विचारणे आवश्यक आहे.
        कामगारांच्या दुर्व्यवस्थेला कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की, "कामगार वर्गाच्या जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश आहे."हा उद्देश पाहता आजच्या घडीला कामगार संघटना ह्या कामगार वर्गाचे जीवनस्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. कामगार संघटनेचे नेतृत्व सुद्धा फक्त पदासाठी आपसांत संघर्ष करतांना दिसून येतात. काही प्रसंगी भांडवलशाहीशी हातमिळवणी करण्यात देखील ते मागेपुढे पाहत नाहीत.कामगार संघटनेचे नेतृत्व हे स्वार्थी आणि पथभ्रष्ट असेल तर कामगारांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच कामगारांची स्वतंत्र आणि संघटित अशी स्वावलंबी संघटना असणे आवश्यक आहे. ब्राम्हणशाहीने ग्रस्त आणि वर्चस्ववादी प्रवृत्तीचे नेतृत्व कामगारांना न्याय मिळवून देण्यास कधीच सक्षम असणार नाही.म्हणूनच कामगार संघटनेचे नेतृत्व हे शोषित पिडितांच्या दुःखाची जाण असलेल्या व्यक्तींकडेच असले पाहिजे. जेणेकरुन ते कामगारांच्या न्याय हक्काची लढाई सक्षमपणे लढू शकतात.
         डॉ.बाबासाहेबांच्या मते देशातील ८०% शोषित पिडीत लोकांवरील होणारा जुलूम समूळ नष्ट करुन त्यांचे जीवन सुखाचे करणे, हेच खरे राजकारण होय आणि ज्या राजवटीत शेतकरी, मजूरांस पिळणारे शेठसावकार यांचे प्राबल्य असते ती राजवट देशाचे खरे हित कधीच साधू शकणार नाही.जर आज भारतात खरोखर शोषित-पिडीत,शेतकरी आणि कामगारांचे हित पाहणारे सरकार राहिले असते तर त्यांच्याशी असा भेदभावाचा व्यवहार झाला नसता.म्हणूनच डॉ.बाबासाहेब कामगारांना राजकीय सत्ता हाती घेण्याचे आवाहन करतात. ते म्हणतात की, "कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल." जी राजकीय संस्था शेठसावकार आणि भांडवलदारांचे हित साधण्याचा प्रयत्न करते त्या संस्थेपासून नाडलेल्या वर्गाने अलिप्त राहण्याचा इशाराही डॉ. बाबासाहेब देतात. इ.स. १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला हा इशारा जर शेतकरी आणि कामगार वर्गाने लक्षात घेतला असता तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची आणि कामगारांना अशाप्रकारे लाचारीने जीवन जगण्याची वेळ आली नसती.
       अध्ययनाचे महत्त्व विषद करतांना डॉ. बाबासाहेब श्रमिकांना म्हणतात की, "ज्ञानाशिवाय अधिकार मिळत नाहीत. भांडवलशाहीला मुक्त हस्त देणाऱ्या सरकारपेक्षा नियंत्रणाखाली असलेल्या यंत्रणेला ज्ञानाची अत्युच्च पातळी व प्रशिक्षण मिळवावे लागेल. दुर्दैवाने भारतातील श्रमिकांनी अध्ययनाचे महत्त्व जाणले नाही. एक श्रमिक नेता म्हणून भांडवलदारांना शिवीगाळ करणे आणि अधिकाधिक शिवीगाळ करणे हीच सुरुवातीपासून श्रमिक नेत्यांची भूमिका राहिली आहे.डॉ. बाबसाहेबांच्या या विचारानुसार आपणास असे लक्षात येते की,कामगारांच्या हक्क अधिकारासाठी लढा लढतांना कामगार नेत्यांना जगातील कामगार चळवळींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कामगारांचे मूलभूत हक्क अधिकार आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची जाणही नेतृत्वाला असणे आवश्यक आहे.
        वर्तमान स्थितीत कामगारांचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते जर सोडवायचे असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार आणि कामगार चळवळ या संदर्भात जे महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत त्या विचारांचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे. अन्यथा कामगार वर्गाला अशाचप्रकारे शोषणाच्या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल. म्हणून ही शोषणाची व्यवस्था उखडून फेकायची असेल तर कामगार वर्ग म्हणून एकत्र येऊन संघटितपणे लढा दिल्याशिवाय पर्याय नाही.


प्रणाली मराठे- धुळे.
9970955255
संदर्भ - कामगार चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...